
कोल्हापूरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या उद्दिष्ठाला आणि देशाच्या शाश्वत विकासाला वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता, उर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यासह रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विकास दर वाढला असून, खऱ्या अर्थाने “गरिबी हटाव” च्या दिशेने देशाने वाटचाल अधिक सक्षम केली आहे. विशेषतः चामड्यांची उत्पादने आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त केली असल्याने कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस येणार आहेत. एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.