
कागल : कागल तालुक्यात बालविवाह निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन्स यांच्या समन्वयाने ‘बालविवाह मुक्ती रथ’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या हस्ते आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधाची सामूहिक प्रतिज्ञा घेत समाजातून बालविवाह पूर्णतः हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना कुलदीप बोंगे यांनी बालविवाह ही समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरणारी गंभीर समस्या असल्याचे नमूद केले. .”बालविवाह रोखण्यासाठी गावागावात प्रभावी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. रथ गावात आल्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच गावातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. बालविवाहाच्या घटना रोखून मुला-मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
बालविवाह मुक्ती रथाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये भेटी, संवाद, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या अभियानामुळे कागल तालुका बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी संस्थेचे प्रतिनिधी प्रभा यादव, नीता आवळे,अमोल कदम, आनंदा कांबळे,प्रतिक्षा बुचडे, आरिफ पानारी, मुस्तफा शिकलगार, माधुरी कांबळे, समीक्षा कोळी,आयेशा पटेल, बिस्मिल्ला जमादार, शर्मिला कांबळे, शैला कुरणे,रचना कांबळे, सायली मोरे,गायत्री कुंभार , सानिका चव्हाण उपस्थित होते.