
परिते (ता.करवीर) : जोतिबा डोंगरावरील मुजोरी व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी या मागणीसाठी परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली हा मोर्चा दसरा चौक व्हीनस कॉर्नर मार्गे बसंत बहार रोड वरून जिल्हाधिक कार्यालयावर धडकला मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे की
परिते तालुका करवीर गावचा वार्षिक यात्रोत्सव २२, २३ व २४ मार्च २०२६, रोजी संपत्र झाला. यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी येथील देवालयातून होते. सकाळी श्री जोतिबा देवास विधिवत अभिषेक घातला जातो त्यानंतर सासनकाठीचे पूजन करून प्रदक्षणा मार्गातून ५ फेऱ्या मोठ्या आनंदात व उत्साहात गेली सुमारे १५ ते २० वर्षे निर्विघ्नपणे पार पडत आहेत. यावेळी ३०० भाविक भक्त उपस्थित असतात.
मात्र यावेळी प्रदक्षणा मार्गात सासणकाठी आली असताना काही स्थानिक पुजाऱ्यांनी नारळ सोलण्याच्या टोच्या उगारून दहशतीने हुज्जत घातली. त्यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला व भाविकांच्या भावना दुखावल्या स्थानिक पुजाऱ्यांनी परिते गावातील भक्तांना दांड्याने मारायला सुरुवात केली. भक्तांच्या डोक्यात नारळ फोडण्या सारख्या गंभीर घटना घडल्या. यावेळी परिते गावचे सरपंच मा. मनोज पाटील उपस्थित होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गावच्या भक्तांची सुरक्षा महत्त्वाची मानून व श्री क्षेत्र जोतिबा धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखावे म्हणून सरपंचांनी माफीनामा सुध्दा लिहून देऊन विषय मिटविला होता. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. तरीपण जोतिबाच्या सेवेत असणाऱ्या मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी परितेच्या भक्तांना गल्लीगल्लीत शोधून गटाने कायदा हातात घेऊन पुन्हा मारहाण केली. पुजाऱ्यांनी मात्र सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन परितेच्या भक्तांवर मद्य प्राशन करून गोंधळ घातल्याचा खोटा आरोप केला. स्थानिक प्रशासन व पुजाऱ्याऱ्यांनी आपल्याकडून घडलेल्या चुका लपविण्यासाठी असे कायमपणे बाहेरील भक्तांवर आरोप करण्याचा हा मुजोरपणा जिल्ह्यातील भक्त मंडळी कायम अनुभवत आहेत. टोच्या दाखवून दहशत निर्माण करणे, दांड्याने मारहाण करणे अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याची मुजोरी देवस्थान कमिटी व व्यवस्थापन यांना मान्य आहे काय?,
परिते गावात यात्राकाळात सलग ३ दिवस दारू दुकाने बंद असतात, मटण शॉप बंद असतात तसेच मांसाहारी हॉटेल बंद ठेवली जातात याकरिता ग्रामपंचायतीकडून लेखी नोटीस द्वारे कळविले जाते व संपूर्ण गाव या काळात शाकाहारी असते. श्री जोतिबास शाकाहारी नैवेद्य देणाऱ्या परिते गावचे भक्त अशाप्रकारे परंपरेचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या भाविकांवर खोटे आरोप कशासाठी केले? तेव्हा आम्हाला येथील पुजाऱ्यांची मुजोरी, गुंडशाही, भक्तांची अडवणूक करणे, मारहाण करणे, याचा आमच्यागावाने निषेध केला आहेच. भविष्यात या मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांचे काय करायचे? असे आमचा गाव विचार करत आहे..
मुजोरी व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्याच पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करावी,,,. गुंड प्रवृत्तीच्या मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी तसेच केले कारवाई बाबत आम्हास कळवावे.
सर्व सामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहून दर्शनघ्यावे लागते. मात्र पुजाऱ्यांना आर्थिक व्यवहार केल्यावर थेट दर्शन देण्याची पध्दती तात्काळ बंदच व्हावी ,,,प्रशासनाने ठेवलेल्या दान पात्रा व्यतिरिक्त इतर सर्व ठेवलेली देणगी पात्रे त्वरित हटवावीत.
वरील मागण्यांसंदर्भात येत्या १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊन आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक मान्य करून कार्यवाही करावी तसे न झाल्यास येत्या काळात गावच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे