
जयसिंगपूर : महावितरण कंपनीकडून मार्च अखेर थकीत वीजबिलापोटी १० अश्वशक्ती च्या वरील थकीत शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्याने ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होवून पिके वाळू लागल्याने संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर धडक देवून कार्यकारी अभियंता यांना जाब विचारत तातडीने कनेक्शन जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले.
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून वसुलीच्या नावाखाली ५० ते ६० हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने वीज तोडणीचे आदेश दिले होते यामध्ये शेकडो शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात आली. मात्र याच वारणा नदीवर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या नावावर पाच कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन आहेत या पाच कनेक्शनचे मिळून जवळपास ३१ लाख ६६ हजार ११० रूपयाची थकबाकी असतानाही त्यांचे कनेक्शन कट न करता अद्याप पर्यंत चालू ठेवण्यात आल्याने लोकप्रतिनिधींना सरंक्षण व शेतक-यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले होते.
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दानोळी , कोथळी , उमळवाड या गावासह वारणा व कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्यी १० एच.पी वरील सर्व कनेक्शन कट करून विद्युत पुरवठा खंडित केला आहे.सध्या उन्हाचा तीव्रता वाढल्याने ऊस पिकासह भाजीपाला व अन्य पिकांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने पिके करपू लागली आहेत. १० एच.पी वरील शेतकरी हे अल्पभुधारक ८ ते १० शेतकरी एकत्रितपणे येवून दोन -दोन किलोमीटर पाईपलाईन करून पाणी उपसा करतात. यामुळे या शेतकऱ्यांनाही मोफत वीजबिलाचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी संबंधित ज्या शेतकऱ्यांची वीज तोडणी खंडीत केली आहे त्यांची वीज तोडणी तातडीने जोडण्यात यावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम शिंदे , महादेवराव धनवडे , धनगोंडा पाटील , शरद कांबळे, श्रीकांत पाटील , शितल बोरगांवे , अजित आलमाने , प्रकाश भोकरे , विजय चिवटे , गौतम इंगळे , संतोष उपाध्ये , राहूल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.