
उंदरवाडी (ता. कागल) : येथे पाण्याच्या शोधात आलेल्या आठ गव्यांचा अख्खा कळपच कालव्यात पडला. सर्व गव्यांना ग्रामस्थांनी तसेच वनरक्षक शरद कांबळे, राधानगरीच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देत बाहेर काढले. दमलेल्या एक वर्ष वयाच्या गव्याच्या पिल्लाला कालव्यातून बाहेर काढून जीवदान देत त्याला परत कळपात सोडले. ही घटना सकाळी घडली.
उंदरवाडी दरम्यान जंगलात असलेल्या बादा नावाच्या शेतातून पाणी पिण्यासाठी आलेले सात-गवे व एक पिल्लू कालव्यामध्ये पडले. कालव्याला प्लास्टर असल्याने त्यांना बाहेर पडता येत नसल्याने ते सर्व गवे पाण्यातून वाहत उंदरवाडीच्या कालव्यापर्यंत आले.
सकाळी ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनरक्षक शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला. कांबळे यांनी राधानगरी रेस्क्यू टीमचे साईनाथ पुंगावकर, अनिरुद्ध साबळे, शैलेश पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी सर्व गव्यांना हुसकावत पाण्यातून बाहेर काढले. याच कळपातील एक वर्ष वयाचे गव्याचे पिल्लू मात्र कालव्यातून वाहतच राहिले. ते दमलेले असल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. परिस्थितीचा अंदाज घेत उंदरवाडीच्या रोहित फासके, प्रतिक पाटील, शंकर पाटील, मेजर स्वप्निल शिंदे व इतरांनी गव्याच्या पिल्लाला कालव्यातून वाहत्या पाण्यामधून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. नंतर त्याला गव्यांच्या कळपात सुरक्षितपणे सोडून दिले.