
या योजनेच्या माहिती पत्रकाच्या अनावरण करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, प्रकाश पाटील, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीचे मनेजर रिता सिंन्हा, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी दिसत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) मार्फत दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून संघाशी संलग्न महिला दूध उत्पादकांच्या सन्मान व सुरक्षिततेस प्राधान्य देत दूध उत्पादक महिलांना विशेष विमा संरक्षण देण्यासाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघ व दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेच्या माहिती पत्रकाचे अनावरण करून गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गोकुळ शिरगाव येथे महिला दिनानिमित्त गोकुळ कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ, मान्यवर, महिला दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष’ म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या वतीने कष्टकरी दूध उत्पादक महिलांना सामाजिक व आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति दूध उत्पादक महिला रुपये २,००,०००/- (अक्षरी रुपये दोन लाख) इतके विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रारंभी संघाशी संलग्न सुमारे एक लाख दूध उत्पादक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदर विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम रुपये १५०/- इतका निश्चित करण्यात आला असून, त्यापैकी ३० टक्के म्हणजे (४५ रुपये) गोकुळ दूध संघाकडून अनुदान स्वरूपात भरली जाणार असून उर्वरित ७० टक्के रक्कम (१०५ रुपये) लाभार्थी महिलांकडून घेण्यात येणार आहे. संघ व विमा कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून अल्प विमा हप्त्या मध्ये मोठे विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न गोकुळने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेचा लाभ वय वर्ष १८ ते ७० वयोगटातील गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील दूध उत्पादक महिलांना घेता येणार आहे. या विम्याचा कालावधी एक वर्षाचा असणार असून या अंतर्गत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व, लाभार्थीच्या आई-वडील अथवा पतीचा अपघाती मृत्यू, अॅसिड हल्ला तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी नियमानुसार विमा भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबावर अचानक ओढवणाऱ्या संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
दुग्ध व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक वेळा अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटांमुळे कुटुंबावर आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी महिलांना सुरक्षिततेचा व आधाराचा हात देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. या योजनेमुळे दूध उत्पादक महिलांना सामाजिक सुरक्षा मिळणार असून त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायातील महिलांचा सहभाग अधिक बळकट होऊन दूध व्यवसायालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या योजनेबाबतचे सविस्तर माहितीपत्रक गोकुळ दूध संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार असून जास्तीत जास्त महिला दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
या प्रसंगी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, प्रकाश पाटील, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या मॅनेजर रिता सिन्हा, कॉ. बबली रावत, कॉ.स्मिता केरिमाने, श्रीमती पद्मजा आपटे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी तसेच संघाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.