
हिम्मत असेल तर थेट पाईपलाईनच्या निकृष्ठ कामाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी : आमदार क्षीरसागर यांची टीका
कोल्हापूर :-महानगरपालिकेत सत्ता उपभोगुन जनतेच्या हितासाठी अकार्यक्षम ठरणारे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत. जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांवर हक्कभंग करणार म्हंटल्यावर माजी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांचा कि ठेकेदारांना महानगरपालिकेचे जावई म्हंटल्याचा पुळका आला आहे काय? अशी विचारणा करत आमदार सतेज पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी विधीमंडळात करावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, निवडणुकीत रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली नाही असा खोटा अपप्रचार करणारे आमदार सतेज पाटील तोंडघशी पडले. रस्त्यांच्या कामात दिरंगाई, दर्जा याबाबतच अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला गेला. पण, अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदाराचा पुळका त्यांना आला आहे. ज्या पद्धतीने निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली जाते त्याच पद्धतीने १०० कोटींचे रस्ते करून घेण्याची धमक आमच्यात आहे. त्याची काळजी माजी पालकमंत्री महोदयांनी करू नये. त्यापेक्षा येणाऱ्या दिवाळीत तरी थेट पाईपलाईनने व्यवस्थित अभ्यंगस्नान होईल का? याकडे लक्ष द्यावे.
प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते. सूचनांचे उल्लंघन करणे हे नियमबाह्य आहे. अधिकाऱ्याची नैतिक जबाबदारी असते की तो जनतेच्या हितासाठी आणि कायदेशीर मार्गाने काम करेल. सूचनांचे पालन न करता किंवा राजकीय दबावाखाली काम करून जनहित डावलणे, हे पदाचा गैरवापर आहे. हक्कभंग हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. एकदा अधिकारी दिलेल्या सूचनांचे पालन न करता किंवा राजकीय दबावापोटी जनहिताच्या कामात टाळाटाळ करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करता येतो आणि येणाऱ्या अधिवेशनात जनहिताच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाच जाईल. वास्तविक खासदार शाहू छत्रपती यांनी दिलेल्या सूचनाही अधिकारी डावलतात असे आमदार पाटील मान्य करतात मग अशाच अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यास आमदार पाटील यांना अधिकाऱ्यांचा पुळका का आला?
सणासुदीच्या काळात आमदार पाटील यांनी अभ्यंगस्नान केलेली थेट पाईपलाईन बंद पडली. शहरातील माताभगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होत्या. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष पाणीपुरवठा ठिकाणांना भेट देवून अधिकाऱ्यांना योग्य सूचना देवून पर्यायी यंत्रणा सज्ज करून पाणीपुरवठा सुरळीत केला. पण याप्रश्नी आमदार सतेज पाटील यांनी एकही वक्तव्य केले नाही किंवा बैठक का घेतली नाही? याचा खुलासा करावा. मला जनतेने ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे त्यामुळे जनतेसाठीच काम करणे माझे कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य पार पाडताना कोणालाही शिंगावर घ्यायला मागे पुढे पहात नाही. पण मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? असा पलटवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.
सात नाही आठ कलर द्या, पण… यंदा महापालिकेत भगवाच दिसेल
टोलची पावती फाडणे, कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे राजकारण, सत्तासंघर्षात दक्षिण मतदारसंघाचे केलेले नुकसान, हद्दवाढीबाबत अबोला, शक्तीपीठ महामार्गाला विरोध या पद्धतीने विकास कामांना बगल देवून शहराचे नुकसान करण्याचे काम महापालिकेत सत्ता भोगणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी वर्षोनुवर्षे केले आहे. पण आता जनता त्यांच्या भूलथापाना बळी पडणार नाही. त्यांनी सात नाही आठ कलर द्यावेत, पण या निवडणुकीत महानगरपालिकेवर महायुतीचा भगवाच फडकलेला दिसेल. याची कुणकुण लागल्यानेच बहुतेक आमदार सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असेही प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिले आहे.