
कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. ११ ऑगस्ट, २०२५ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. समस्त हिंदू धर्म संघटनांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदु संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वांना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता सलग गेल्या १२ वर्षांपासून समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होत गेले आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक भागात असे उपक्रम होवू लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून झाली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सदर श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता कमलाकर किलकिले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने होणार आहे. यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार आहे. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत यज्ञास सुरवात होणार आहे. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित असणार आहेत. याचे पौरोहित्य श्री.सुहास जोशी गुरुजी करणार आहेत. यानंतर हिंदू देवतांचे पूजन आणि ५१ महिला भारत माता पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये एकाचवेळी सर्वच जातीपंतातील १०८ दाम्पत्य केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडतील. तर या कार्यक्रमास सुमारे पाच हजार हिंदू जन उपस्थित राहतील. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत येणार आहेत. या कार्यक्रमास हिंदू धर्मातील सर्व पोटजाती, बारा बलुतेदार, जमाती यांच्या प्रतीनिधीसह सर्व प्रमुख मंदिरातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील हिंदूजणांना व घटकांना एकत्र आणण्यासाठी व हिंदू धर्माचा वसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदू जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी समस्त हिंदू धर्म संघटन व सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा वाघापूरकर, यादव महाराज, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, उदय भोसले, सुधीर जोशी वंदूरकर, कमलाकर किलकिले, अशोक रामचंदानी, विक्रमसिंह जरग, सुनील सामंत, विकास जाधव, सौरभ निकम, निरंजन शिंदे, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, राजेंद्र तोरस्कर आदी सकल हिंदू समाज व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.