
कोल्हापूर : कोल्हापूरकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपुष्टात आणत आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांनी फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून न्यायप्रक्रियेच्या नव्या अध्यायाला प्रारंभ घडवून आणला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधण्यात आले.

कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायमूर्ती भारती डांगरे, जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासह न्यायमंडळातील मान्यवर सहभागी झाले.
सोहळ्याला आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलिस विभागाने मान्यवरांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत केले. त्यानंतर सरन्यायाधीश गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्य न्यायमूर्ती आराधे व पालकमंत्री आबिटकर यांनी नव्या सर्किट बेंच इमारतीची पाहणी केली व झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
सीपीआर रुग्णालयासमोर उभारण्यात आलेल्या या सर्किट बेंचसाठी राज्य शासनाने 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या इमारतीसह परिसराचे नूतनीकरण अल्पावधीत पूर्ण करण्यात आले. न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी व नागरिकांना न्याय मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ही नवी इमारत एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे या वेळी व्यक्त करण्यात आले.